अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात
मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात वाळू माफिया सुसाट

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत हा नेरी येथील शिवाजी पुतळ्याजवळून भरधाव वेगाने जात होता. यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या गजानन पाटील यांना डंपरने चिरडले. अपघात इतका भीषण होता की, पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
अवैध वाळू वाहतूक : पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला केली अटक
अपघातानंतर घाबरलेला डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला. परंतु पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला वावदडा येथे पकडले. संबंधित डंपर ताब्यात घेण्यात आला असून, अपघाताच्या वेळी डंपर रिकामा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अवैध वाळू वाहतूक : मृत्यू प्रकरणी स्थानिक आक्रमक..
दरम्यान, या अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन छेडले. स्थानिकांचा आरोप आहे की, या भागात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांचा संताप आणखी भडकला.
अवैध वाळू वाहतूक : प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
मृत गजानन पाटील यांना न्याय मिळावा, अवैध वाळू वाहतुकीवर तात्काळ आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. काही काळ परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. बेजबाबदार प्रशासनामुळेच हा बळी गेला असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू असून, या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास जामनेर पोलिस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…
💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….
💥 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात नेमके काय घडलं?