हॅलो सामाजिक

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात भव्य पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले; समाजाच्या आर्थिक एकजुटीतून उभे राहिले मंदिर व नवनिर्मित सभागृह.

शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता समाजबांधवांच्या वर्गणीतून उभारले वास्तू; नाभिक समाजाच्या अस्मिता व स्वाभिमानाचे ठरले प्रतीक

हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव 

भडगाव : संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भडगावातील नाभिक समाजात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले. येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत सेना महाराजांची पुण्यतिथी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे समाजबांधवांच्या एकजुटीतून आणि आर्थिक योगदानातून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित नाभिक समाज सभागृहाचे लोकार्पण. पाचोरा नगरपरिषद गटनेते तथा आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

नवनिर्मित मंदिर आणि सभागृहाची उभारणी ही केवळ बांधकामाची बाब नसून नाभिक समाजाच्या अस्मिता, स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि संघटित शक्तीचे प्रतीक ठरली आहे. समाजबांधवांनी स्वतः पुढाकार घेत, दररोज वर्गणी जमा करून तसेच विविध नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारला. विशेष म्हणजे या कामासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा आधार न घेता समाजाच्या सामूहिक योगदानातून मंदिर व सभागृह उभारण्यात आले.

संत सेना महाराजांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा

कार्यक्रमाची सुरुवात ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्री संत सेना महाराज व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात संत सेना महाराजांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठेने झाली. मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. नवनिर्मित सभागृहाच्या वास्तुशांतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री श्रीराम भजनी मंडळाच्या भक्तिमय भजनांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले

८ सप्टेंबर रोजी सकाळी मंदिर परिसरातून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पालखी मिरवणूक शिवाजीनगर, शिवशक्ती कॉलनी, बाळद रोड, बसस्थानक परिसर, मेन रोड आणि पाचोरा रोड मार्गे मार्गक्रमण करीत पुन्हा मंदिर परिसरात पोहोचली. विविध ठिकाणी नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र अहिरे, शिवदास महाजन, नितीन महाजन तसेच आरोग्य निरीक्षक संजय सोनार यांच्यासह विविध मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतले.

“एकजुटीने काम केल्यास समाजाची प्रगती निश्चित” — सुमित पाटील. 

पालखी मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात युवा नेते सुमित पाटील यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “समाजाने एकजुटीने कार्य केल्यास समाजाची प्रगती निश्चित होते. नाभिक समाजाचे पाठबळ नेहमीच आमदार किशोर पाटील यांच्या पाठीशी राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”

माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांनीही मनोगत व्यक्त करत समाजातील एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. समाजाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

वर्गणीच्या पैशातून मंदिर अन् सभागृह ; समाजाच्या स्वाभिमानाची वास्तू

नाभिक समाजाने उभारलेले मंदिर व सभागृह हा या सोहळ्यातील सर्वाधिक चर्चेचा आणि अभिमानाचा विषय ठरला. “समाजासाठी समाजच उभा राहतो” या भावनेतून समाजबांधवांनी आपल्या क्षमतेनुसार आर्थिक योगदान दिले. अनेकांनी दररोज नियमित वर्गणी जमा केली, तर काहींनी बांधकाम साहित्य, श्रमदान तसेच इतर स्वरूपात मदत केली.

शासकीय निधी किंवा कोणत्याही योजनेवर अवलंबून न राहता समाजाच्या सामूहिक योगदानातून एवढे मोठे काम उभे राहणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे हे सभागृह केवळ चार भिंतींची वास्तू न राहता नाभिक समाजाच्या एकजुटीचे, स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि आर्थिक शिस्तीचे जिवंत प्रतीक बनले आहे.

समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने योगदान दिल्याने मंदिर आणि सभागृहाची उभारणी शक्य झाली. या माध्यमातून नाभिक समाजाची अस्मिता जपण्याबरोबरच पुढील पिढीला संघटितपणा आणि स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला आहे.

भविष्यात शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प

नवनिर्मित सभागृहाचा उपयोग केवळ सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी न करता भविष्यात समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्यविषयक उपक्रम, रोजगार मार्गदर्शन, गरजू कुटुंबांना मदत आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या माध्यमातून नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी, युवक, महिला आणि गरजू घटकांना एकत्र आणून त्यांच्या विकासासाठी व्यासपीठ निर्माण करण्याची दिशा मिळणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.

अन्नदानातून सामाजिक बांधिलकी

यावर्षीच्या कार्यक्रमातील अन्नदानाचा उपक्रम पोपटराव हरी नेरपगार, सुभाष नेरपगार आणि अनिल नेरपगार यांच्या सहकार्यातून करण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल कार्यक्रमात आभार व्यक्त करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबतच अन्नदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास पाचोरा नगरपरिषद गटनेते सुमित पाटील, भडगाव गटनेते लकीचंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, प्रदीप मालचे, नगरसेवक किशोर बारावरकर, डॉ. विजयकुमार देशमुख, जग्गू भाई, विजयकुमार भोसले, अमोल पाटील, देवाजी अहिरे, सचिन चोरडिया, संतोष महाजन, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुपडू खेडकर, रविंद्र अहिरे, सचिन वखरे (पाचोरा) यांच्यासह नाभिक समाजातील ज्येष्ठ नारायण निकम, पोपट नेरपगारे, निर्मलाबाई शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव येथील खोडे ज्वेलर्सचे संचालक संतोष खोडे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष किशोर वाघ यांनीही कार्यक्रमास भेट देऊन नवनिर्मित सभागृहाची पाहणी केली. समाजाच्या आर्थिक एकजुटीतून मंदिर व सभागृहाची उभारणी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून पदाधिकारी व समाजबांधवांचे अभिनंदन केले.

अध्यक्ष संजय पवार यांचे प्रास्ताविक

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी केले. मंदिर व सभागृहाच्या उभारणीचा प्रवास, त्यासाठी समाजबांधवांनी दिलेले योगदान, आलेल्या अडचणी आणि विविध व्यक्तींनी केलेले सहकार्य याबाबत त्यांनी माहिती दिली. समाजाच्या विश्वासावर आणि एकजुटीवर उभे राहिलेले हे सभागृह पुढील पिढ्यांसाठी उपयोगी ठरावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. भरत ठाकरे यांनी केले. धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

समाजबांधवांच्या परिश्रमातून सोहळा यशस्वी

संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष रवींद्र शिरसाठ, सचिव अ‍ॅड. भरत ठाकरे, खजिनदार दीपक शिरसाठ, सुभाष ठाकरे, नारायण नेरपगारे, दिलीप शिरसाठ, किशोर निकम, विनोद शिरसाठ, भगवान पगारे, नामदेव चव्हाण, संभाजी वेळीस्कर, सूर्यभान वाघ, चाळीसगाव विभाग संपर्कप्रमुख भरत चव्हाण, हिलाल नेरपगार, शिवाजी शिरसाठ, राकेश शिरसाठ, गोरख वेळीस, निलेश महाले (पत्रकार), प्रभाकर नेरपगारे, काशिनाथ शिरसाठ, नंदू ठाकरे, भास्कर पवार, संदीप वाघ यांच्यासह सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

संत सेना महाराजांच्या विचारांचा जागर, समाजाच्या अस्मितेचा अभिमान, आर्थिक स्वावलंबनाची दिशा आणि एकजुटीची ताकद या चारही गोष्टींचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. समाजाच्या वर्गणीतून उभे राहिलेले मंदिर आणि सभागृह हे येणाऱ्या पिढ्यांना “एकजूट असेल तर समाज स्वतःच्या बळावर मोठे स्वप्न साकार करू शकतो” असा प्रेरणादायी संदेश देणारे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button