ब्रेकिंग: गाव करी ते राव काय करी! गाळण गावातील तरुणांचा आदर्श उपक्रम; स्वखर्चातून रस्त्यावर लावले दिवे
पाचोरा प्रतिनिधी (नितीन गोसावी) : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील तरुणांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून घडवून आणला आहे. गावातील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चातून गावातील रस्त्यावर दिवे लावण्याचा उपक्रम राबविला असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गाळण गावात येत्या काही दिवसांत मरीआई मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहे. या यात्रोत्सवानिमित्त मरीआई मातेच्या दर्शनासाठी परिसरासह दूरवरून हजारो भाविक गावात येत असतात. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी भाविकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
ग्रामपंचायत नाही तर स्वखर्चातून राबवला उपक्रम
ही बाब लक्षात घेऊन गावातील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी पुढाकार घेतला. शासनाच्या मदतीची किंवा इतर कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता तरुणांनी एकत्र येत स्वखर्चातून मंदिराकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर खांब उभारून त्यावर विद्युत दिवे बसविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे यात्रोत्सवाच्या काळात भाविकांना रात्रीच्या वेळीही सुरक्षितपणे मंदिराकडे जाता येणार आहे.
गावातील तरुणांनी दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावाच्या गरजेसाठी तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून खर्च करून केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद असून, इतर गावांतील तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.
या उपक्रमासाठी छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांनी व इतर सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून गावातील रस्त्यावरील अंधार दूर होण्यास मदत झाली असून, यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सामाजिक प्रश्नांकडे केवळ प्रशासनानेच पाहावे, अशी अपेक्षा न ठेवता गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेतल्यास गावाचा विकास आणि सुविधा अधिक प्रभावीपणे उभ्या राहू शकतात, हे गाळण येथील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी दाखवून दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
जळगाव शहरात उत्साहात साजरी झाली ‘भगवान श्री वराह जयंती’; सर्व समाज बांधवांची लाभली अलोट उपस्थिती.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर..




