टिटवी येथे अंजनी नदीच्या पुराचा कहर ; सोलर गोडाऊनचे मोठे नुकसान.
पारोळा (जि. जळगाव): जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात टिटवी येथे उगम असलेल्या अंजनी नदीने काल मध्यरात्री रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या परिसरात मोठे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.
या पुरामुळे नदीकाठी असलेल्या शिवम माळी यांच्या सोलर साहित्याच्या गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या प्रचंड प्रवाहात गोडाऊनमधील सोलर पॅनल, एचडीपीई (HDPE) पाईप्स, वायर रोल तसेच इतर साहित्य वाहून गेल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून संबंधित प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अंजनी नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




