मल्लिकार्जुन खर्गे च्या अपमानाविरोधात भुसावळात काँग्रेसचा निषेध सत्याग्रह.
‘रघुपती राघव राजाराम’ भजनातून समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर
भुसावळ, दि. १६ ऑगस्ट २०२६ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे च्या विरोधात झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज भुसावळ येथील यावल नाका परिसरात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी – ग्रामीण पूर्व व जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने निषेध सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गात शांततामय पद्धतीने सत्याग्रह केला. तसेच संबंधित घटनेचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार आणि समान प्रतिष्ठा दिली असून जात, धर्म अथवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याच्या प्रवृत्तीला समाजात स्थान असू शकत नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
मागासवर्गीय समाजातून पुढे येऊन देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान प्राप्त केलेल्या मल्लिकार्जुन खर्गे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात अशा प्रकारचे कृत्य घडणे हे केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांवर आघात करणारी मानसिकता असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रवृत्ती काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या भावनेला अधिक बळ देत समाजामध्ये समता, बंधुता, एकात्मता आणि परस्पर सन्मानाची मूल्ये रुजवण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने कार्यरत राहील, असा संकल्प या सत्याग्रहाच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच खरगे साहेबांचे फोटोचा दूध अभिषेक करण्यात आला.
या आंदोलनास धनंजय शिरीष चौधरी, अध्यक्ष – जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्व; जमील शेख, अध्यक्ष – जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ; माजी आमदार शिरीषदादा चौधरी, सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी; मुफ्ती हारून नदवी, योगेंद्र भैय्या पाटिल, किरण राजमल पाटील, रवींद्र निकम, हरीश गंडवानी, ज्ञानेश्वर कोळी, अनंत परिहार,राजेंद्र पाटील, देवा भाऊ ठाकरे ,वाय. एस. महाजन, कैलास शेळके, राहुल भालेराव, जगदीश गाडे, मुन्वर खान, प्रवीण सुरवाडे, इस्माईल गवळी, फयाज हुसैन, अनंत परिहार, ऐश्वरी राठोड, शैलेश बोदडे, अश्फाक काझी, संतोष साळवे, राजेश डोंगरदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




